शिरूर दि. १४ : ( अरुणकुमार मोटे)
कायद्याचे रक्षण करणाऱ्या शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारातच दि. १३ च्या मध्यरात्री गोंधळ, दगडफेक आणि मारामारीचे थरारक चित्र घडले यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशनच्या आवारातच दोन गट आमनेसामने येत एकमेकांवर हल्ले करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच ठाणे अमंलदार कक्षातीत काही वस्तुंची तोडफोड झाल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, दि.१३ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान शिरूर पोलीस स्टेशनच्या आवारात आणि पुणे अहिल्यानगर महामार्गावरील पंचायत समिती कार्यालयासमोर हा संपूर्ण प्रकार घडला. सुरुवातीला तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू झाली. काही वेळातच हा वाद उग्र रूप धारण करत मोठ्या जमावात परिवर्तित झाला. सुमारे ३५ ते ४० जणांचा जमाव एकत्र येऊन एकमेकांवर दगडफेक आणि मारहाण करू लागला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार सतिश मुंडे, उमेश भगत व सहकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने परिस्थिती आणखी चिघळली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी सौम्य बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या दगडफेकीत गणेश भोसले व राजू शेवाळे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी हरीश रवींद्र राजपूत, राजू शेवाळे, गणेश भोसले, विनोद जाधव, सलमान शेख, हाफीज शेख, कलिम सय्यद, कय्यूम सय्यद, तेजस जाधव, हबीब सय्यद, तरबेज, काळू बोरगे (सर्व रा. शिरूर) यांसह जवळपास ४० ते ५० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस स्टेशनच्या आवारातच अशा प्रकारे कायद्याचा भंग होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “पोलीस स्टेशनमध्येच सुरक्षितता नसेल तर सामान्य नागरिकांनी कुठे जावे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी,चैन स्नॅचिंग,विद्युत रोहित्र चोरी, शेतकऱ्यांच्या केबल, विद्युत मोटारी, अवैध शस्त्र बाळगणे, अवैध धंदे, अमली पदार्थ विक्री या घटना दिवसेंदिवस मोण्या प्रमाणात वाढतच आहे. शिरूर तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलीसांचा धाक कमी होत चालल्याची भावना व्यक्त होत असून, प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे. शिरूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याने सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज बुधवारी (दि १५) पासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत.
पत्रकारांना माहीती देण्यास टाळाटाळ….
या घटनेबाबत पत्रकारांनी अनेक वेळा संपर्क करूनही शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची माहिती पोलीस देत नाही. असा आरोप होत आहे. अखेर पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांना फोन केल्यानंतर ही माहिती प्राप्त झाली.

