शिरूर दि. ०५ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यात सध्या एकाच चर्चेला उधाण आले आहे. “सुलभ भिसी”च्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या एका महिलेचा कथित कारनामा समोर येत असून, यात बडे पोलिस अधिकारी–कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही तब्बल ३० कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
कारेगाव पोलिस स्टेशनमध्ये रोजची हजेरी, पोलिसांशी सलगी, अधूनमधून जेवणावळी, वारंवार भेटीगाठी अशा पद्धतीने संबंधित महिलेने पोलिसांचा विश्वास संपादन केल्याची चर्चा रंगली आहे. “घरच्यासारखी” वागणूक मिळवून तिने आपले जाळे शांतपणे विणले. सुरुवातीला छोट्या रकमा, वेळेवर परतावा आणि आकर्षक व्याजदर यामुळे अनेकांचा तिच्यावर विश्वास बसला.
हळूहळू “सुलभ भिसी”च्या माध्यमातून मोठ्या रकमा जमा होऊ लागल्या. पोलिसांमध्ये गुंतवणूक सुरू असल्याचे दाखवत, “वरच्या स्तरावर विश्वास आहे” अशी छाप निर्माण केली गेली. याच विश्वासाच्या जोरावर काही उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांनीही लाखो-कोटींची गुंतवणूक केल्याचे समजते.
बदली होऊन गेलेल्या एका महिला उपनिरीक्षकांनी तब्बल ५० लाख रुपये गुंतवले होते, अशी जोरदार चर्चा आहे. त्यांनाही मोठा आर्थिक फटका बसल्याचे बोलले जाते. तसेच शिरूर पोलिस स्टेशनमधील एका महिला कॉन्स्टेबलची सुमारे ३७ लाख रुपयांची गुंतवणूक अडकली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच एका ट्रॅफिकवाल्या पोलिस महिलेची 15 लाखांची फसवणूक केली आहे. दोनही कॉन्स्टेबल महिलांनी कर्ज काढून त्यांना पैसे दिले होते. यातून हुशार बाबूजीही सुटले नाही.
या गुंतवणुकीत एका पोलीस निरीक्षकांचाही समावेश असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे संपूर्ण पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या आर्थिक फसवणुकीची चर्चा असूनही अद्याप ठोस गुन्हा दाखल होत नाही. “गुन्हा दाखल झाला तर पैसे परत मिळणार नाहीत” या भीतीमुळे काही जण पुढे येत नसल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, एका महिलेने लेखी तक्रार अर्ज दिल्याचे समोर आले आहे. मात्र त्यावर काय कारवाई झाली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे “पोलिसच गुंतले असतील तर तपास कोण करणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
फसवणुकीची रक्कम नेमकी किती, याबाबत अद्याप ठोस आकडेवारी समोर आलेली नसली तरी, एका माजी जिल्हा परीषद सदस्याच्या माहीतीनुसार एकुण रक्कम ३० कोटी रुपयांच्या घरात असल्याची चर्चा आहे. अनेकांनी रोख, तर काहींनी बँक व्यवहारातून पैसे दिल्याचे सांगितले जाते.
सुरुवातीला वेळेवर पैसे परत मिळाल्याने विश्वास वाढत गेला. मात्र नंतर हप्ते थकू लागले, फोन बंद होऊ लागले आणि भेटी टाळल्या जाऊ लागल्या. “आठवडाभरात देतो”, “थोडा वेळ द्या”, “वर अडचण आली आहे” अशी कारणे देत वेळ काढला गेला, असे काही गुंतवणूकदार सांगतात.
“पोलिसांनीही गुंतवणूक केली आहे” असे सांगून संबंधित महिलेने अनेक बडे उद्योजक व व्यापाऱ्यांना भुरळ घातली. पोलिसांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची भावना निर्माण करून विश्वासार्हता वाढवली गेली, अशी चर्चा आहे. त्यामुळे अनेकांनी कोणतीही लेखी हमी न घेता लाखो रुपये दिल्याचे बोलले जाते.
हे प्रकरण अधिकृतरीत्या उघडकीस येणार का? गुन्हा दाखल होणार का? की सर्व काही ‘आतील स्तरावर’ मिटवले जाणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस दलातील काही जण स्वतःच आर्थिकदृष्ट्या अडकले असतील, तर निष्पक्ष चौकशी होईल का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे. कारण हा फक्त आर्थिक गुन्हा नसून, विश्वासघाताचा गंभीर प्रकार आहे. पोलिस ठाण्याशी जवळीक साधून, त्याच ठिकाणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढणे, आणि त्याच नावावर सर्वसामान्यांना फसवणेही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
दरम्यान, अधिकृत भूमिका समोर येईपर्यंत या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “सुलभ भिसी”चा हा कथित घोटाळा खरोखरच ३० कोटींचा आहे का, की आकडे अजून वाढणार आहेत? हे येणारा काळच ठरवेल. मात्र शिरूर तालुक्यात या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडवली आहे.

