शिरूर | (अरुणकुमार मोटे)
पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे आरोपी पतीचे नाव असून अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), सार्थक राजू जाधव (वय ६) व गौरी राजू जाधव (वय ४ महिने) अशी मृतांची नावे आहेत.
पाबळ येथील एका वीटभट्टीवर कामासाठी असलेल्या अहिला उर्फ भाग्यश्री व राजू जाधव या दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होत असल्याने भाग्यश्री ही मानसिक त्रासाला कंटाळली होती. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल व आजदेखील या दाम्पत्यामध्ये भांडण झाले होते. आज सकाळच्या सुमारास भाग्यश्री ही आपल्या दोन्ही लहान मुल सोबत घेऊन सायकलवर घराबाहेर पडली. मात्र, दुपारपर्यंत….. घरी न परतल्याने पती राजू याने आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या परमेश्वर पिंगळे यांच्या विहिरीजवळ सायकल व भाग्यश्री आणि तिच्या मुलांच्या चपला आढळून आल्या. त्यानंतर पतीने आरडाओरडा करीत स्थानिकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर, विशाल देशमुख, गणेश येळवंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने विहिरीतून महिलेसह दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेत अहिला उर्फ भाग्यश्री जाधव, तिचा सहा वर्षांचा मुलगा सार्थक व चार महिन्यांची मुलगी गौरी हे तिघे (सध्या रा. पाबळ ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. बीबी ता. लोणार, जि. बुलढाणा) यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मृत भाग्यश्रीची बहीण जयश्री सुनील जाधव (वय ३५, सध्या रा. एकेरी माळ, पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. खडकी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी राजू पांडुरंग जाधव (वय ३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करीत आहेत.


